चालता बोलता न्यूज

Search Everything

मावळ तालुक्यातील अवैध धंद्यांवर धडक कारवाया करा; खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रशासनाला सूचना 

Main Admin / Jun 20, 2026, 06:30 AM IST

Article link copied

मावळ (प्रतिनिधी) - फुगेवाडी परिसरात विषारी दारूमुळे तेरा जणांचा मृत्यू झाला आहे. मावळ तालुक्यात अवैध धंदे सुरू राहता कामे नयेत. धडक कारवाया कराव्यात. ड्रग्ज, अमली पदार्थ विक्री कणाऱ्यांवर मोक्काची कारवाई करा, अशा सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी केल्या आहेत. मावळ तालुक्याची आढावा बैठक खासदार बारणे यांनी शुक्रवारी पंचायत समिती कार्यालयात घेतली. आमदार सुनील शेळके, तहसीलदार विक्रम देशमुख, मावळ पंचायत समिती सभापती सुनिताताई येवले, उपसभापती साहेबराव कारके, शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाऊ खांडभोर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शरदराव हुलावळे, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ सावंत, जिल्हा परिषद सदस्य संतोष राऊत, जिल्हा परिषद सदस्या मनीषा मुर्हे, जिल्हा परिषद पल्लवीताई दाभाडे, जिल्हा परिषद सदस्य अनंत पावशे, पंचायत समिती सदस्य प्राचीताई गायकवाड, दिलीप शिंदे, राजेंद्र कडलक, शैलाताई कालेकर, आशाताई मोरमोर, पंचायत रेश्माताई देवकर, योगेश लोहर, सुनीताबाई येवले,युवासेना मावळ तालुका प्रमुख विशाल लोखंडे, उपतालूका प्रमुख अमित कुंभार,धनंजय नवघने, सोमनाथ कोंडे,मदन शेडगे, व सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. शिक्षण, अंगणवाडी, कृषी, आरोग्य, स्थापत्य विषयक कामांचा आढावा घेतला. खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, केंद्र सरकारच्या माध्यमातून मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात जलजीवन मिशनची कामे सुरू आहेत. या कामाचा दर्जा राखावा. कामाला गती द्यावी. मुदतीत कामे पूर्ण करावीत. घरकुल योजनेतील त्रुटी दूर कराव्यात. पीएमआरडीए आणि वन विभागाकडून घरकुलसाठी ना-हरकत दाखला मिळत नसल्याची तक्रार आहे. नागरिकांना तत्काळ दाखले द्यावेत. रस्त्यासह विविध भागांतील विकास कामाच्या दर्जाबाबत सातत्याने तक्रारी येतात. निकृष्ट दर्जाचे काम होता कामा नये. कामाचा दर्जा राखावा. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे. वैद्यकीय सुविधा दर्जेदार द्यावी. रुग्णांशी व्यवस्थित संवाद साधावा. डॉक्टर, नर्स अधिकचे मनुष्यबळ पुरविण्यात येईल. पावसाळापूर्वीची कामे पूर्ण करावीत. नालेसफाई शंभर टक्के पूर्ण करावी. पावसाळ्यात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. दरवर्षी जेथे पाणी साचते, तेथील पाणी तत्काळ काढण्यासाठी उपाययोजना कराव्यात. शेतकऱ्यांना मुदतीत खते पुरविण्यात यावीत. शेतकऱ्यांना सातत्याने पावसाचे अपडेट द्यावेत, अशा सूचनाही खासदार बारणे यांनी दिल्या आहेत. 

Advertisement Slot