चालता बोलता न्यूज

Search Everything

देहू ते आळंदी पालखी मार्ग "संतभूमी" म्हणून जाहीर करा - अभय टिळक 

Main Admin / Jun 23, 2026, 10:25 AM IST

Article link copied

पिंपरी (प्रतिनिधी) महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रातील समस्त वारकरी संप्रदाय हा या पवित्र भूमीला मातृभूमी मानतो. कैवल्य मूर्ती संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची जन्म, कर्म आणि निर्वाण भूमी असणाऱ्या आळंदी, देहू आणि टाळगांव चिखली परिसरास हा वारकरी संप्रदाय मनोभावे नमन करून "संतभूमी" मानतो. देहू ते आळंदी हा १६ किलोमीटर चा पालखी मार्ग राज्य सरकारने "संतभूमी" म्हणून जाहीर करावा अशी मागणी आळंदी देवस्थानचे माजी मुख्य विश्वस्त अभय टिळक यांनी केली.


   पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अभय टिळक बोलत होते. यावेळी हभप राजू महाराज ढोरे, डॉ. स्वाती मुळे आदी उपस्थित होते. यावेळी अभय टिळक यांनी सांगितले की, ज्याप्रमाणे उत्तरांचल सरकारने "देवभूमी" नावाने काही परिसर जाहीर करून त्या परिसरास संरक्षण दिले आहे आणि त्या तेथील पावित्र्य जपून विकास कामे केली आहेत. त्याच धर्तीवर देहू ते आळंदी या पंचक्रोशीतील परिसर संतभूमी म्हणून जाहीर करावा. तसेच या भूमीची सार्वजनिक स्वच्छता, सामाजिक सुरक्षितता अखंड राखण्यासाठी शासनाने विशेष निधी देऊन विकास करावा अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच केंद्रीयमंत्री यांच्याकडे आम्ही करीत आहोत यासाठी आवश्यक तो पत्र व्यवहार व पाठपुरावा केला जात आहे. 
   हभप राजू महाराज ढोरे यांनी सांगितले की, या १६ किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या किमान १०० मीटर अंतरावरील स्वच्छता राखावी. पवित्र इंद्रायणी नदीच्या किनारी अनेक ठिकाणी प्रदूषित व अस्वच्छ पाणी थेट नदीत सोडले जात असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी आवश्यक तेथे एसटीपी प्रकल्प विकसित करून इंद्रायणी नदीचे पावित्र्य जपावे अशी ही मागणी आम्ही राज्य सरकारकडे करीत आहोत.

  पुढील महिन्यात होणाऱ्या पंढरपूर यात्रेच्या अगोदर महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, महाराष्ट्र विधान परिषद आणि विधानसभेचे सर्व आमदार, राज्यसभा व लोकसभेचे सर्व खासदार, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि या परिसरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी यांना आम्ही "संतभूमी" जाहीर करण्याबाबतचे निवेदन देऊन पाठपुरावा करू. तसेच वारकऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये देखील याबाबत जनजागृती केली जाईल, असे हभप राजू महाराज ढोरे यांनी सांगितले.

Advertisement Slot