वायसीएमचे ढिसाळ व्यवस्थापनाने रुग्णांचा जातोय जीव
Article link copied
पिंपरी
यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील गैरव्यवस्थापनामुळे झालेल्या मृत्यूबद्दल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे यांनी महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून संचलित करण्यात येणाऱ्या वायसीएममध्ये शुक्रवारी (दि. ५ जून) हॉस्पिटलच्या गैरवस्थापनामुळे व निष्काळजीपणामुळे एका ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा आमचा आरोप आहे. पीसीएमसी निवृत्त कर्मचारी रावसाहेब वामन खंडागळे यांचा शुक्रवारी फुगेवाडी ते दापोडी दरम्यान अपघात झाला असता त्यांना वायसीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले.
वायसीएम हॉस्पिटलमध्ये बॅटरी चार्ज नाही, असे कारण सांगून खंडागळे यांचा एक्स-रे काढण्यास अर्ध्या तासापेक्षा अधिक विलंब लावण्यात आला. रुग्णाबरोबरच्या व्यक्तींनी अनेकदा विनंती करूनही तेथील महिला कर्मचारी त्यांच्याशी उद्धटपणे बोलत होत्या. बॅटरी आल्यानंतर एक्स-रे काढला आणि त्यानंतर सोनोग्राफी करण्याची गरज असते तिथेही या रुग्णाच्या पुढे आणखी दोन-तीन रुग्ण असल्यामुळे त्यांच्या सोनोग्राफीला उशीर झाला.
खरंतर इमर्जन्सी म्हणून तातडीची गरज पाहता या रुग्णाला प्राथमिकतेने सोनोग्राफीसाठी घेणे आवश्यक होते. दरम्यानच्या काळात रुग्णाच्या शरीरामध्ये कदाचित अंतर्गत रक्तस्राव झाल्यामुळे त्यांची परिस्थिती गंभीर होऊन आयसीयूमध्ये दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे हॉस्पिटलने जाहीर केले.
हा सर्व प्रकार पाहता वायसीएममध्ये किती बेजबाबदारपणे कामकाज चालते याची प्रचिती येते. ज्या रुग्णालयामध्ये प्रतिदिन हजारापेक्षा अधिक रुग्ण येऊन उपचार घेत असतात त्या रुग्णालयामध्ये अशा प्रसंगी एक्स-रे मशिन, सोनोग्राफी मशिन एकच असणे हे चुकीचे असल्याचे मानव कांबळे यांनी सांगितले.
--------
रुग्णालयाच्या कारभारात सुधारणा हव्यात
रुग्णालयाचे अधिष्ठाता असलेल्या डॉक्टर राजेंद्र वाबळे यांना व्यवस्थापनामध्ये सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात याव्यात. कर्मचाऱ्यांना इमर्जन्सीमध्ये कुठल्या पेशंट्सकडे प्राधान्याने लक्ष द्यायला पाहिजे, याबद्दलचे प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. वायसीएममध्ये रुग्णांच्या, नातेवाइकांच्या अनेक तक्रारी वारंवार येत असतात. परंतु, व्यवस्थापकीय पातळीवर आणि प्रशासकीय पातळीवर त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नाही, असा आरोप कांबळे यांनी केला आहे.
Advertisement Slot